शिक्षक दिन भाषण मराठी 2023 Teachers Day Speech in Marathi

Teachers Day Speech in Marathi – Speech On Teachers Day in Marathi 5th September सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे सुज्ञ परिक्षक आणि चांदन्यांप्रमाणे चमचमणारे सर्व रसिक श्रोतेहो. मित्रहो, वास्तविक पाहता शिक्षक दिनाबद्दल नेमके काय लिहावे? या विवंचनेत मी होते. पण, रामायणातील खारुताईचा एक प्रसंग माझ्या लक्षात आला आणि माझ्या मनातील नंदादीप उजळू लागला. मग मी ठरवलंच की शिक्षक म्हणजेच आपले आयुष्य घडवणारे कलाकार, मूर्तिकार, गुरू यांच्याबद्दल आज याठिकाणी भाषण करायचच.

तर मित्रांनो, प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकवणारे पहिले भारतीय उपराष्ट्रपती तसेच, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या जन्माच्या स्मरणार्थ आपल्या भारत देशामध्ये ५ सप्टेंबर यादिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. होय! मी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलत आहे, ज्यांनी आपल्या भारत देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम केले.

teachers day speech in marathi
teachers day speech in marathi

शिक्षक दिवस भाषण मराठी – Teachers Day Speech in Marathi

शिक्षक दिन भाषण मराठी – Short Speech On Teachers Day in Marathi

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक नामांकित विद्वान आणि उत्कृष्ट शिक्षक देखील होते. ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इतके लोकप्रिय होते की ते अक्षरशः सर्वांसाठी पूजनीय होते. एकदा राष्ट्रपती म्हणून सेवा देत असताना, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करण्यास परवानगी देण्यास सांगितले; परंतु, त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला आणि त्यांनी आपला हा जन्मदिवस सर्व विद्यार्थ्यांना ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यास सांगितला.

अशाप्रकारे, आपण सर्वजण त्या दिवसापासून ५ सप्टेंबर रोजी येणारा ‘शिक्षक दिन’ हा समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या शिक्षकांच्या सेवांचा सन्मान करण्यासाठी साजरा करतो. खरोखरच, संपूर्ण भारतभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा  दिवस म्हणजे एक सन्माननीय सोहळा आहे.

प्रत्येक वर्षी त्यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा आदर करण्यासाठी हा दिवस सगळीकडे खूप उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून प्रिय मित्रांनो, आपणदेखील स्वतःच्या शाळांतील, विद्यालयातील तसेच, कॉलेजमधील शिक्षकांना मनापासून आदर देण्यासाठी या उत्सवात सामील व्हायला पाहिजेत.

आपले गुरुजन हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यामध्ये आणि विद्यार्थ्यांना आपल्या भारत देशाचे आदर्श नागरिक बनवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा घेतात आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेतात. भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन हा एक अवसर आणि त्यांच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला भावी आकार देण्याच्या अविरत, निस्वार्थी आणि अनमोल प्रयत्नांसाठी आदरांजली वाहण्याचा सुंदर असा सुवर्णदिवस आहे.

भारत देशातील सर्व दर्जेदार शिक्षण प्रणाली समृद्ध करण्याचे आणि कधीही न थकता सतत त्यावर प्रक्रिया करण्याचे हे कारणे आहेत.

मित्रांनो, शिक्षक दिनाची उत्सुकता ही सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना खूप असते. कारण, यादिवशी शाळेतील, विद्यालयातील आणि कॉलेजमधील मुलामुलींना शिक्षक होण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते.

शिक्षक दिनाच्या चार दिवसाआधीच त्यांची शिक्षक बनण्याची तयारी सुरू असते. कोणत्या वर्गावर, कोणता विषय शिकवायचा? वर्गात जाताना कसा प्रवेश करायचा? वर्गात गेल्यावर जर मुलंमुली आपल्यावर हसली तर! आपण काय करायचे? मुलांना शिकवताना मध्येच मी थांबणार नाहीना? अशा अनेक प्रश्नांचे जाळे त्यांच्या मनात शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी तयार होत असते.

एकदा का शिक्षक दिवस उजाडला की सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकांच्या पोशाखामध्ये शाळेमध्ये जातात. दिवसाच्या सुरुवातीला त्यांना आपण खूप वेगळे असल्याचे वाटत असते.

परंतू, एकदा का शिक्षक म्हणून ते शाळेमध्ये वावरायला लागले की ते बिनधास्तपणे शाळेत रमतात. वर्गावर शिकवायला जाताना त्यांच्या मनात आधीच भीतीने घर केलेले असते, त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसतात. पण, त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली की त्यांच्यामध्ये वर्गात मुलांना शिकवण्याचे धाडस निर्माण होते आणि ते वर्गामध्ये व्यवस्थितरीत्या शिक्षकाची भूमिका बजावतात.

पण आपल्याला माहीत आहे की वर्गातील काही मुल खूप आगावं असतात, अशी मुल शिक्षक झालेल्या मुलांचं काहीही ऐकत नाहीत. शिवाय, ही मुल वर्गात खूप दंगा देखील घालतात. अशावेळी, शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांच्या संयमाची जाणीव होते. आपले शिक्षक अख्खा वर्ग कसा सांभाळत असतील!

इतक्या मुलांना सांभाळत शिकवणं किती जड असत याची जाणीव त्यांना होते. अशा पद्धतीने, शिक्षक दिनादिवशी पुर्ण शाळेमध्ये एक वेगळेच उत्सुकतेने वातावरण असते.

आपले शिक्षक हे आपल्याला त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे समजून आपल्यावर माया लावतात आणि आपल्याला मनापासून शिकवतात. लहान मुले म्हणून आपणा सर्वांना आपल्या प्रिय शिक्षकांकडून नक्कीच प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते.

ज्ञान आणि धैर्याने जीवनातील कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले गुरू हे आपल्याला तयार करत असतात. प्रिय शिक्षकांनो, खरंच आम्ही तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहोत.

गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र परंपरा आहे. आपल्या जीवनातील आई- वडिलांची जागा ही कुणीही भरून काढू शकत नाही, कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात.

भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा नांदत असल्यामुळे, शिक्षक हे आपल्याला आयुष्यातील प्रगती पथावर चालण्याचा योग्य मार्ग दाखवतात आणि योग्य दिशेकडे शिष्याची वाटचाल करण्यासाठी त्याला  प्रेरित देखील करतात. 

खरंतर, शिक्षकांच्या हातात देशाचं भविष्य असतं. कारण, शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचं नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. म्हणूनच, शिक्षकांना दुसरे पालक असेही म्हटले जाते.

आपले विचार, मते आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे आपल्या शिक्षकांचा खूप मोठा त्यामध्ये वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्त आणि योग्य शिक्षण घेऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये येते. त्यामुळे, शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील महत्व आपल्याला समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन प्रत्येक शाळेमध्ये साजरा केला जातो.

शिक्षक दिन हा पवित्र दिवस शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने दरवर्षी साजरा केला जातो. यादिवशी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम जसे की वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे किंवा आपल्या शिक्षकांबद्दलचे मनोगत व्यक्त करणे यांचे आयोजन केले जाते.

अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. यादिवशी, विद्यार्थी वर्ग हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शिक्षकांचा सन्मान करताना आपल्याला दिसतो. अनेक विद्यार्थी पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ग्रीटिंग यांसारख्या वस्तू शिक्षकांना भेट म्हणून देऊन त्यांचे आभार प्रदर्शन व्यक्त करतात.

मित्रांनो, शिक्षक हा एकाच बागेत विभिन्न प्रकारची आणि निरनिराळ्या रंगांची फुलं सजवणार्‍या एखाद्या माळ्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काम करत असतो. आपले शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आपण जर आपल्या भारत देशात थोडंसं डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, आजकाल प्रत्येक घरामध्ये शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जात आहे.

खऱ्या अर्थाने, शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न आहे आणि म्हणूनच शिक्षक हे यादिवशी सन्मानाचे हक्कदार असतात. आपणा विद्यार्थ्यांचे चरित्र हे शिक्षकच चांगले निर्माण करू शकतात. परंतू, आजचा शिक्षक आपल्याला काळासोबत बदलते रुप धारण करताना दिसत आहे, हेदेखील तितकेच खरे आहे.

आज सगळीकडे शिक्षणाचा बाजार झाला असून, ज्ञानाची बोली खूप शाळांमध्ये लावली जाते. वर्तमानात गुरु-शिष्य परंपरा कलंकित होत आहे. अनेकदा शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांशी तर, विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांसोबत दुर्व्यवहार होत असल्याच्या बातम्या आपण नियमितपणे टीव्हीवर पाहत असतो.

अशा बातम्या पाहिल्या की मन अगदी सुन्न होत आणि गुरु-शिष्य परंपरेवर अनेक संशयी प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे दायित्व आहे की या महान परंपरेला उत्तमरित्या समजून, समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे. मित्रहो, शिक्षक दिनानिमित्त मी बरेच लेख वाचले होते, मी वाचलेल्या सर्रास लेखांमध्ये शिक्षकांच भरभरुन कौतुक केलं गेल होत.

पण मित्रहो, तुम्हीच सांगा खरंच आपल्या देशात पूर्वी सारखा शिक्षक आज आहे का? किती शिक्षक पोटतीळकीने विद्यार्थ्यांना शिकवतात? किती विद्यार्थी शाळेत म्हणा किंवा कॉलेजला खरच शिकण्यासाठी जातात? किती विद्यार्थी शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये निव्वळ टाईमपास करायला जातात? खरंतर मित्रांनो, शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबर आपली शिक्षण पद्धतीही याला तेवढीच जबाबदार आहे.

खरंतर, अस बोलून शिक्षकांची मने दूखवण्याचा माझा मुळीच हेतू नाही. पण, मी आज नायईलाजास्तव तुम्हाला आजच कडू सत्य या गोड समयी सांगत आहे. एका शिक्षकानेच जर आजच्या शिक्षणपद्धती विरोधात वाचा फोडली नाही तर, भविष्यात असल्या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांना काय उपयोग होईल?

मित्रांनो, आजची शिक्षण प्रणाली ही परीक्षा प्रणालीच रुप धारण करताना आपल्याला दिसत आहे. मला तर वाटतं की सरकारनेच आता यामध्ये योग्य तो हातभार लावला पाहीजे. आजची आपल्या भारतातील शिक्षण पद्धत योग्य बनवण्यासाठी मदत केली पाहीजे.

शिक्षण पद्धतीवर योग्य अशा तज्ज्ञांकडून सर्वे झाला पाहीजे, त्यावर अभ्यास झाला पाहीजे. तरच, आजच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल. याशिवाय, संस्कारांच ज्ञान देखील याच ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांना दिल गेल पाहीजे. म्हणूनच मला अस वाटत की या सर्व चांगल्या बदलांमध्ये शासनाचा खुप मोठा सहभाग असायला हवा.

आजच्या एकविसाव्या शतकात आपल्या भारतामध्ये संगणक युग आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही संगणकाच प्राथमिक शिक्षण सगळीकडे दिलं गेल पाहिजेत. याशिवाय, अलीकडच्या जगामध्ये अनेक प्रकारचं नवनवीन तंत्रज्ञान देखील येत आहे. त्यामुळे त्याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना  मिळायला हवे. आज आपल्या भारतामध्ये चालणारी शिक्षण पद्धत जर सुधरली, तरच शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या अनेक समस्यांच निराकरण होईल. परंतू, या बदलांसाठी शिक्षकांनीच पुढाकार घेतला पाहिजेत.

मित्रांनो, शिक्षक म्हणजे ज्ञानाचा आणि पावित्र्याचा समुद्रच असतो. शिक्षक हा अपूर्ण गोष्टींना पुर्ण करणारा, आपल्या शब्दांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणारा, आपल्या जगण्यातून मुलांचे जीवन घडविणारा, अनेक तत्वांतून जीवन जगताना आवश्यक असणारी मूल्ये फुलवणारा असतो. आपल्याला हा शिक्षक प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये दडलेला पाहायला मिळतो.

जिथे ध्येय दिसते, तिथे विद्यार्थ्यांना शिक्षकच नेतो. सत्य शिकवणारा, शाळेमध्ये शिकवलेले धडे विद्यार्थ्यांकडून वदवून घेणारा, ज्ञानाची ओळख करून देणारा आणि विद्यार्थ्यांना निस्वार्थ तळमळीने शिकविणारा व्यक्ती म्हणजे साक्षात शिक्षक असतो. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करतात.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे धाडस शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात. याशिवाय, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा देखील विकास होतो.

‘गुरु-शिष्यांच्या’ पवित्र बंधनाला आणखीन  दृढ करणारा ‘शिक्षक दिन’ हा दिवस खरंच किती पवित्र असतो! भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्यांची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे. ‘व्यास पौर्णिमेला’ आपण आपल्या आध्यात्मिक गुरुंना वंदन करतो. याशिवाय, जागतिक शिक्षक दिन आपण सर्वजण पाच ऑक्टोबर रोजी साजरा करतो. जगभरात तर, शिक्षक दिन हे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात.

जसे, अफगाणिस्तानात शिक्षक दिन हा २४ मे रोजी, अर्जेंटिना देशात ११ सप्टेंबरला, भूतानमध्ये २ मे यादिवशी, ब्राझील राष्ट्रात  १५ ऑक्टोंबरला तर, चीनमध्ये शिक्षक दिन हा १० सप्टेंबर आणि आपल्या भारत देशात ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, ‘The Importnace of Education is Not Only in Knowlege and Skill But it is to Help Us to Live with Other’s’.

आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना राधाकृष्णन सरांचा विचार आपल्या सर्वांसाठी किती मोलाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. या त्यांच्या विधानावरून ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ या वचनाची प्रचिती येते. त्यांनी, शिक्षकत्वाच्या आदर्शाचा राजपथ तयार केला आहे. प्रत्येक शिक्षकान खर्‍या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ आणि उद्यमशील भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे.

शिवाय, ‘शिक्षक दिन’ हा  दिवस साजरा करायचा म्हणजे बाकीच्या दिवशी शिक्षकासह समाजातल्या सर्व घटकांनी त्यांना व त्यांच्या कार्याला ‘विस्मृत’ करायचे असे नव्हे. त्यांच्या गुणांचा आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे.

सर्व शिक्षक-प्राध्यापकांचे आदर्श, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, श्रोतंना मंत्रमुग्ध करणारे कुशल वक्ते, राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक, भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्त्वचिंतक अशा विविधांगी व्यक्मित्वाचे धनी असलेले भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आजच्या आपल्या शिक्षकांसमोर उत्तुंग आणि प्रेरणादायी असे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.

मित्रहो, आजच्या वर्तमानकाळात काही ‘शिक्षक’ हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते ‘मार्गदर्शक’, समुपदेशक देखील आहेत. खरंतर,  शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न आणि  व्यासंगी असते; तसेच व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर परिणाम करत असते. म्हणूनच, तत्त्वज्ञान कितीही बदलले किंवा  अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत केवढाही बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. 

‘गुरुचा असावा ध्यास। प्रश्नांची व्हावी रास।

मग यश मिळेल हमखास॥’

त्यामुळे मित्रांनो,  शिक्षकांबद्दलचे असे म्हणणे अजिबात अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ‘शिक्षक’ हा कामगार नाही तर तो ‘शिल्पकार’ आहे, कलावंत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षक हा मनापासून पेलत असतो. आपला ‘पाल्य’ यशस्वी झाल्यावर त्या पाल्याच्या पालकांना जितका आनंद होतो, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आनंद हा त्या पाल्याच्या शिक्षकांना होत असतो.

त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय जरी आपण शिक्षकांना दिले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त अशा व्यक्तिमत्वाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे आणि अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांवरच आहे. माणूस हा त्याच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो.

‘जो-जो ज्याचा घेतला गुण। तो तो गुरु म्या केला जाण।’ 

हे ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या गुरुंविषयी म्हणजेच शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. मित्रांनो, विद्यार्थी हा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तशाच प्रकारे, शिक्षकही निव्वळ ‘अर्थार्जनाचे’ साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारे असता कामा नयेत.

खरंतर, ‘शिक्षक’ असण्याची पहिली अट ही ‘विद्यार्थी’ असणे हीच आहे. ‘शिक्षक’ हा केवळ ‘पोपटपंची’ करणारा, प्रश्नांना उत्तर न देणारा असेल, तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार हे कधीही संभवणार नाहीत. शिक्षक आणि विद्यार्थी हे परस्परपूरक असायला हवेत. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो.

परंतू, माहिती तंत्रज्ञानाचा ‘विस्फोट’ झालेल्या काळात विद्यार्थी हा  पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. त्यामुळे, माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत.

पण, आज गरज आहे ती या साधनांची योग्य ती ‘दिशा’ त्यांना खुली करून द्यायची. त्यामुळे, विद्यार्थी हा विनाकारण कुठेही भटकणार नाही. याशिवाय, ‘माहिती-व्यवस्थापन’ करत ‘कुतूहल’ व ‘जिज्ञासा’ जागृत करण्याचे काम शिक्षकांचे असते. आजच्या झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत अध्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे.

आजच्या विज्ञानाच्या काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे.

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण, जीवघेणी स्पर्धा, अध्यपन-अनुसंधानाविषयी सरकार व शिक्षकांची उदासीनता अशा अत्यंत विचित्र परिस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांचा ‘जन्मदिन’ साजरा करताना तो केवळ शिक्षकांचे स्तुतिपर कार्यक्रम, परंपरा, रिवाज म्हणून न करता शिक्षक, समाज, राज्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, जबाबदार पालकांनी अंतर्मुख होऊन नवीपिढी, नवा देश घडविताना आपण आपल्या कर्तव्याचे पालन कितपत प्रामाणिकपणे करत आहोत, हे आपण स्वतःला विचारले पाहिजे.

त्याचबरोबर, शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला रोजगार मिळावा, मूलभूत नागरी व वैयक्तिक मूल्ये विकसित व्हावीत. म्हणून आजच्या ‘शिक्षक-दिनी’ आपणाला संस्कारमय बनविलेल्या सेवेतील व्रतस्थ महान शिक्षकांना विनयांजली अर्पण करून, त्यांच्याप्रमाणे आपणही आयुष्याचे सार्थक करूया, हीच आजच्या शिक्षक दिनी प्रार्थना!

शिक्षक दिनानिमित्त कविता

गुरूर्ब्रह्मा,गुरूर्विष्णुः,गुरूर्देवो महेश्वरः

गुरूर्साक्षात् परब्रह्म् तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुर ब्रह्मा : गुरु ब्रह्मा (निर्माता) सारखा आहे.

गुरूर विष्णु : गुरु विष्णू (संरक्षक) सारखा आहे.

गुरूर देवो महेश्वरा : गुरु हा भगवान महेश्वर (विध्वंसक) सारखा आहे.

गुरु: साक्षात् : खरा गुरू, डोळ्यांसमोर आहे.

परब्रह्म : सर्वोच्च ब्राह्मण.

गुरुवे नम : त्या एकालाच: मी त्या खर्‍या गुरुला.

अर्थातच याचा अर्थ असा होतो की, गुरूंना ब्रह्मासारखे (निर्माता) मानले जाते. कारण, त्याने तुमच्यात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली आणि तुम्हाला योग्य दिशेने नेले. जगातील नकारात्मक प्रभावापासून गुरु तुमचे रक्षण करतो आणि तुमच्या प्रगतीस मदत करतो, म्हणून गुरु विष्णू (रक्षक) मानला जातो.

गुरूंना शिव (विध्वंसक) देखील मानले जाते. कारण, त्याने आपल्या दुःखाचा नाश केला आणि तिथूनच कर्मबंध हटविण्याचा मार्ग सुद्धा मोकळा केला. वास्तविक पाहता, आत्मा म्हणून गुरू हा परमब्रह्मांचा अवतार आहे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देवून त्यापासून सुंदर मडकी घडवतात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख असा आकार देवून त्यांना यशस्वी बनवण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. पण, त्यानंतर मात्र प्रत्येक पाल्याला घडवण्याचे काम शिक्षकच करतात.

त्यामुळे मित्रांनो, आजपासून आपण ही या शिक्षक दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन, आपल्या गुरुंना मानवंदना करूयात आणि त्यांचे आपण आयुष्यभर ऋणी देखील राहूयात. शेवटी, इतकं बोलून मी माझं वक्तव्य इथच थांबवते. धन्यवाद!

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या teachers day speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “शिक्षक दिन भाषण मराठी “ shikshak din bhashan marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या short speech on teachers day in marathi या shikshak diwas par nibandh in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi teachers day speech माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण 5 september teachers day in marathi या लेखाचा वापर teachers day information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “शिक्षक दिन भाषण मराठी 2023 Teachers Day Speech in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!