संत निवृत्तीनाथ यांची माहिती Sant Nivruttinath Information in Marathi

Sant Nivruttinath Information in Marathi संत निवृत्तीनाथ माहिती ज्याप्रमाणे चातकाला मेघाच्या आगमनातून जीवन मिळते, चकोर पक्षाला चंद्रदर्शनातून आनंद मिळतो तसेच हरीभक्तांचे आहे. संतांसाठी वैकुंठप्राप्ती हेच त्यांच्या विश्रांतीचे स्थान असते. आशा आणि भवपाश सोडून केवळ नामस्मरणातूनच ते तृप्त होतात. Sant Nivruttinath mahiti प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले, वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे सकल तीर्थ, ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद्भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश देणारे “संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज”. विश्व- आत्म- स्वरूप म्हणजे निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्वदर्शन.

sant nivruttinath information in marathi
sant nivruttinath information in marathi

संत निवृत्तीनाथ यांची माहिती – Sant Nivruttinath Information in Marathi

संत निवृत्तीनाथ महाराज यांचा जीवन परिचय

नावसंत निवृत्तीनाथ
जन्मइ. स. १२७३,आळंदी
आईरुक्मिणीबाई
वडीलविठ्ठलपंत
गुरुश्रीगुरू गहिनीनाथ
मृत्यूइ.स. १२९९, त्र्यंबकेश्वर
शिष्य संत ज्ञानेश्वर

संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म इ.स. १२७३ (माघ वद्य प्रतिपदा, शके ११९५ ) ला आळंदी येथे कुलकर्णी कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत हे विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी सन्यास घेतला व काशीला गेले. विवाहित असल्याने त्यांच्या गुरुनी त्यांना परत पाठवले. गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला व कालांतराने त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई.

श्रीगुरू गहिनीनाथ व निवृत्तीनाथ यांची भेट  

निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते. असे सांगितले जाते कि, एकदा विठ्ठलपंत हे पत्नी आणि मुलांसमवेत त्र्यंबकेश्वर मागील डोंगरावर गेले होते. डोंगरात धावत आलेल्या वाघाच्या भयाने तेथून पळून गेले. जंगलातून बाहेर आल्यावर निवृत्तीनाथ कुठेच दिसेनात. त्यांना सगळीकडे शोधले पण निवृत्तीनाथ सापडले नाहीत. सात दिवसानंतर दत्त म्हणून ते विठ्ठलपंतांसमोर उभे राहिले. वाघाला भिऊन पळत असताना निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले. त्या गुहेत गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ हे तपश्चर्या करीत बसले होते. त्यांनी निवृत्तीनाथाना योग शिकवला, उपदेश दिले आणि जगामध्ये जे गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर, अशी आज्ञा केली. आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेले ज्ञान हे ज्ञानेश्वरांना द्यावे अशी सूचना केली. अशा प्रकारे “नवनाथांपैकी गहीनीनाथांचे शिष्यत्व निवृत्तीनाथाना” प्राप्त झाले.

“निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाचि होय | गयिनीनाथे सोय दाखविली ||”

असे संत निवृत्तीनाथानी आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे.

विठ्ठलपंत हे तीर्थयात्रा करत आळंदी येथे स्थायिक झाले. तत्कालीन सनातनी समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रम स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. त्यावर उपाय म्हणून धर्मशास्त्रींच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायश्चित्त केला. त्यानंतर पोरक्या झालेल्या निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडाना समाजाकडून त्रास दिला गेला. त्यांना अन्न, पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. मुलांची मुंज करणेही नाकारले.

निवृत्तीनाथ हे थोरले बंधू असल्यामुळे भावंडांचा सर्व भार हा त्यांच्यावर पडला. निवृत्तीनाथांनी त्यांचा सांभाळ माता-पित्याच्या वात्सल्याने केला. निवृत्तिच्या परिवारासाठी श्रीहरीचे नामस्मरण करणे म्हणजे जणू रत्नाने भरलेला सागर आहे.

“सोपान सवंगडा स्वानंद ज्ञानदेव | मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ||”

संत ज्ञानेश्वरांनी अनेक संतमंडळींसहित केलेल्या तीर्थयात्रेत निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होते. त्यावेळी निवृत्तीनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. त्याचप्रमाणे संत सेना महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखोबा, संत एकनाथ, जनाबाई, कान्होपात्रा, सोपान असो कि मुक्ताई, या सर्व संतानी निवृत्तीनाथांचे गुणगायन केले आहे.

संत एकनाथ महाराजांनी संत निवृत्तीनाथ महाराजांविषयी आपल्या अभंगातून म्हणतात,

“धन्य धन्य निवृत्ती देवा | काय महिमा वर्णावा ||

शिवे अवतार धरून | केले त्रैलोक्य पावन ||

समाधी त्र्यंबकशिखरी | मागे शोभे ब्रह्मगिरी ||

निवृत्तीनाथांच्या चरणी | शरण एका जनार्दनी ||”

ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ

संत निवृत्तीनाथाना श्रीगुरू गहिनीनाथांकडून महान अशा नाथ परंपरेचा वारसा लाभला होता. नाथ परंपरेचे निवृत्तीनाथ शिष्य होते. हा गुरूपरंपरेचा वारसा आदिनाथ भगवान शंकर, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ असा निवृत्तीनाथांना मिळाला होता. गुरूंकडून मिळालेले ज्ञान हे आपल्या भावंडाना देण्याची त्यांच्या गुरूंची आज्ञा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या भावंडाना ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांना उपदेश करून आपले शिष्य बनवले.

गुरूंच्या आज्ञेनुसार गुरुपरंपरेने मिळालेले सर्व ज्ञानभांडार त्यांनी ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले आणि आपण त्या यशापासून निवृत्त झाले.

संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद्भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” (“भावार्थदीपिका”) लिहून काढली.  

संत निवृत्तीनाथ यांचे साहित्य

  • संत निवृत्तीनाथांनी योगपर, अद्वैतभक्तीपर, कृष्णभक्तीपर असे सुमारे ४०० अभंग आणि एक हरिपाठ रचना केली आहे.
  • निवृत्तीदेवी, निवृत्तीसार, उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथ निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते.
  • धुळे येथील श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते आहेत, ती निवृत्तीनाथांची आहेत असे सांगितले जाते.

संत निवृत्तीनाथ अभंग रचना

संत निवृत्तीनाथ यांनी रचलेले अभंग रसाळ असून पंढरपूर या तीर्थ क्षेत्राची महती, योगपर, अद्वैतभक्तीपर, कृष्णभक्तीवर्णनात्मक असे विषय हाताळले आहेत.

“निवृत्ति घनवट विकलिसे पेठ | पुंडलिके प्रगट केले असे ||”

“पुंडलिकभाग्य वोळले संपूर्ण | दिनदिशी कीर्तन विठ्ठलहरी ||”

“निवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण | कुळ हे पावन कृष्णनामे ||”

“निवृत्ति कीर्तन दिनदिशी ध्यान | मनाचे उन्मन इये रुपी ||”

“पुंडलिक पेठ वैष्णवाचा हाट | करिती बोभाट हरिनामाचा ||”

“पुंडलिका पुण्य मेदिनीकारुण्य | उद्धरिले जन अनंत कोटी ||”

“धन्य हा खेचर धन्य हा सोपान | भक्तीचे जीवन जनक हेतु ||

धन्य याचे कुळ पवित्र कुशळ | नित्य या गोपाळ जवळी असे ||”

संत निवृत्तीनाथ समाधी

ज्ञानेश्वर ,सोपानदेव आणि मुक्ताई हे आपली भावंडे समाधिस्थ झाल्यानंतर संत निवृत्तीनाथ म्हणतात,

“तुझ्यामुळे हरि चालतो उगला | देहा आधी गेला प्राण माझा ||

ज्येष्ठांचे आधी कानिष्ठांचे जाणे | केले नारायणे उफराटे ||

सर्व संतमंडळी निवृत्तीनाथाना समाधी देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाली होती. प्रत्यक्ष पांडुरंगाने स्वतः संतांचे पूजन केले.

सुंदरनारायण गोरविला फार | केला नमस्कार वैष्णवांनी || 

गोदावरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर | चालले भार वैष्णवांचे ||”

निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ रोजी (इ.स. १२९९) संजीवन समाधी घेतली. याच ठिकाणी त्यांना गहिनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली होती.

ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.

आम्ही दिलेल्या Sant Nivruttinath Maharaj information in Marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant Nivruttinath information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर Sant Nivruttinath maharaj in Marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!